अकोले / प्रतिनिधी
टोमॅटोची लागवड वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना तंत्रशुद्ध मार्गदर्शन मिळावे. या हेतूने नामांकित बियाणे उत्पादन कंपनी सिजेंटा इंडिया लिमिटेड व विश्व हायटेक नर्सरी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (ता.2) सकाळी 10 वाजता पावसाळी टोमॅटो पीक व्यवस्थापन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
बाजारात मोठी मागणी असलेले आणि नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांची पसंती असलेल्या टोमॅटोचे क्षेत्र गेल्या दोन वर्षांतील विविध संकटांमुळे कमालीचे घटले आहे. या पार्श्वभूमीवर टोमॅटो क्षेत्राची वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांना तंत्रशुद्ध मार्गदर्शन मिळण्याबरोबर प्रोत्साहन देण्यासाठी या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिजेंटा कंपनीचे नाशिक विभागाचे व्यवसाय व्यवस्थापक रोहित पोरे, उत्तर अहमदनगर जिल्हा वरीष्ठ क्षेत्रीय व्यवस्थापक शशीकांत कराळे व विश्व हायटेक नर्सरीचे संचालक वीरेंद्र थोरात यांनी लागवड ते काढणीपर्यंतचे टप्पे समजावून सांगितले. सूक्ष्म नियोजन व अचूक वेळ यांची सुयोग्य सांगड घातली तर नक्कीच टोमॅटो पिकात यशस्वी होवू शकता, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला. शेवटी शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना तज्ज्ञांनी उत्तरे दिली. सदर चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी सिजेंटा कंपनीचे गणेश सहाणे व विश्व हायटेक नर्सरी परिवाराने परिश्रम घेतले.