महेश पगारे/अकोले
तालुक्यातील वीरगाव – देवठाण शीव रस्त्यावरील एका शेतकऱ्याने लहरी निसर्गाशी मुकाबला करण्यासाठी नवा फंडा शोधला आहे. द्राक्ष पिकाचे पावसामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी बागेवर प्लास्टिक कागदाचे आच्छादन टाकले आहे. या प्रयोगामुळे काढणीला आलेला शेतमाल वाचणार आहे.
वीरगाव – देवठाण शीव रस्त्या परिसरातील प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी डॉ. जालिंदर खुळे यांची चार एकर द्राक्ष बाग आहे. गेल्या वर्षी अवकाळी पावसाने त्यांचे सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे यंदा सावध पवित्रा घेतला असून, पावसापासून काढणीला आलेल्या फळांचे संरक्षण करण्यासाठी नवा फंडा शोधला आहे.
चार एकर द्राक्ष बागेपैकी दोन एकर बागेला प्लास्टिक कागदांचे आच्छादन टाकले आहे. यामुळे अवकाळी पावसापासून काढणीला आलेला माल वाचणार आहे. या प्रयोगासाठी त्यांना साधारण दीड लाख रुपयांचा खर्च आलेला आहे. द्राक्ष पीक हे मूळातच खर्चिक पीक आहे. हवामान जर सातत्याने बदल झाले तर द्राक्ष उत्पादक पीक वाचविण्यासाठी सर्वतोपरी पीक वाचविण्यासाठी धडपड करत असतो. त्यादृष्टीनेच शेतकरी डॉ. खुळे यांनी आपल्या पिकाचे नुकसान टाळण्यासाठी नवा फंडा वापरला आहे. 20 जानेवरीपासून फळ काढणीला सुरुवात होणार आहे. त्यातच गेल्या दोन वर्षांपासून कोविडचे संकट सुरू आहे. याचा शेती क्षेत्रालाही मोठा फटका बसत आहे. बाजारभाव आणि निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्याच्या मूळावर उठलेले आहे. अशा परिस्थितीतही शेतकरी हिंमतीने उभे राहत असल्याचे दिसत आहे.
द्राक्ष पीक हे मूळातच खर्चिक आहे. त्यात जर बाजारभाव मिळाले नाही आणि निसर्गामुळे नुकसान झाले तर शेतकरी आणखी कर्जात बुडतो. त्यामुळे शासनाने विमा नियमांत बदल करुन द्राक्ष उत्पादकांना दिलासा द्यावा.
– डॉ. जालिंदर खुळे (द्राक्ष उत्पादक)