महेश पगारे, अकोले
तालुक्यातील तांभोळ येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा असल्याने कांदा पिकासाठी नवीन तंत्रज्ञान वापरले आहे. तब्बल साडेतीन एकर क्षेत्रावरील कांदा लागवडीसाठी मल्चिंग पेपरचा वापर केला आहे. अहमदनगर जिल्ह्यात बहुधा हा पहिलाच प्रयोग असल्याचे शेती अभ्यासकांचे म्हणणे आहे.
तांभोळ हे गाव तसे पाहिले तर डोंगरांच्या मध्यभागी वसलेले आहे. त्यामुळे पाण्याचे स्त्रोत दुर्लभ आहे. शेती सिंचनासाठी शेतकऱ्यांना विविध स्त्रोतांवर अवलंबून राहावे लागते. अनेक शेतकऱ्यांनी थेट प्रवरा नदीपात्रातून पाईपलाईन आणलेली आहे. त्यामुळे त्यांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होते. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची कमतरता आहे असे शेतकरी बारमाही पीक काढण्यास असमर्थ ठरतात. यावर कैलास व विलास भांगरे या प्रयोगशील शेतकरी बंधूंनी रामबाण उपाय शोधला आहे.
निसर्गाची अवकृपा आणि महागाई लक्षात घेता भांगरे शेतकरी बंधूंनी साडेतीन एकर कांद्याची लागवड करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. मल्चिंग पेपरचा वापर करुन त्यांनी डिसेंबर महिन्यात कांदा लागवड केली आहे. यासाठी त्यांना प्रतीएकर तेरा हजार रुपयांचा खर्च आला आहे. सध्या हे पीक अतिशय जोमदार आले असून, उत्तम गुणवत्तेचा कांदा उत्पादित होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. शेतीत स्थैर्य मिळविण्यासाठी इतर शेतकऱ्यांनी देखील नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
मल्चिंग पेपरवरील कांदा लागवडीचे फायदे..
मोठ्या प्रमाणात पाणी बचत होते, रोपांची मुळी चांगली बनते, लागवड एकसारखी होत असल्याने उतार चांगला राहतो, तणांचा बंदोबस्त होतो, तणनाशक न मारल्याने जमिनीतील जिवाणू जिवंत राहतात, खतांचा आप्टेक चांगला होतो, पिकाची एकसमान वाढ होते, रसशोषक किडींचा प्रादुर्भाव रोखता येतो, पाण्याबरोबर खतांचेही बाष्पीभवन रोखले जाते, पेपरचा काळा रंग उष्णता टिकवून ठेवतो तर सिल्व्हर रंग उष्णता रोखून धरतो.